BIG NEWS | पक्ष हरला, व्यक्ती जिंकली;बारामतीत पवारांच्या सत्तेला पहिली ठेच


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क….

नगरपालिका निवडणूक म्हटली की मतदार पक्षाचे चिन्ह पाहतो, अशी जुनी समजूत बारामतीच्या निवडणुकीत पूर्णपणे मोडीत निघाली आहे.यावेळी मतदाराने पक्ष नव्हे तर माणूस पाहून मतदान केल्याचं स्पष्ट चित्र समोर आलं आहे.महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं राजकारण ज्या बारामतीतून फिरतं,पवारांचं पावर हाऊस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरातच सत्ताधारी राजकारणाला पहिल्यांदाच जोरदार धक्का बसला आहे.नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर पवार कुटुंबातील फूट उघड झाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असा थेट सामना होईल,अशी अपेक्षा होती.मात्र शरद पवार गट अपेक्षेप्रमाणे आक्रमक दिसला नाही. ठराविक जागा लढवून त्यांनी मोकेपेक्षा सावध रणनीती स्वीकारली.आणि उर्वरित मैदान इतर पक्ष व अपक्षांसाठी खुले राहिले.याचा थेट फायदा व्यक्तीप्रधान राजकारणाला झाला.

बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच सहा विरोधक नगरपालिकेत पोहोचले.त्यामध्ये प्रभाग ५ : रासपचा धक्का.प्रभाग क्रमांक ५ मध्ये रासपच्या उमेदवाराचा विजय हा राष्ट्रवादीसाठी धोक्याचा इशारा आहे. येथे दिग्गज नावांचा पराभव होणं म्हणजे केवळ स्थानिक नाराजी नाही, तर संघटनात्मक अपयशाचं प्रतीक मानलं जात आहे.प्रभाग २० : ‘बाहेरचा’ उमेदवार अन् स्थानिक संताप. प्रभाग २० मध्ये पक्षाने दिलेला “बाहेरचा” उमेदवार स्थानिकांना न रुचल्याने, अपक्ष उमेदवाराने राष्ट्रवादीच्या दिग्गजाला छातीठोक पराभूत केलं.इथेही चुकीची उमेदवार निवड पक्षाला महागात पडली.प्रभाग १३ : तुतारीचा सूर राष्ट्रवादीला बोचला.प्रभाग १३ मध्ये तुतारी चिन्हावरील उमेदवाराचा विजय हा स्पष्ट संदेश देतो —चिन्ह नाही,व्यक्ती महत्त्वाची ही बाब पक्षाच्या धोरणकर्त्यांनी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे.प्रभाग १५ : ‘नवख्याने’ दिग्गजांची चार मुंड्या चित संपूर्ण बारामतीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेला प्रभाग १५.

इथे पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने पवार समर्थक कुटुंबातील दिग्गज उमेदवारालाच पराभवाची धूळ चारली. हा पराभव केवळ व्यक्तीचा नसून,पक्षाच्या रणनीतीवर लागलेली मोठी प्रश्नचिन्हं आहेत. प्रभाग १४ : ‘हत्ती’ संघर्षाला अखेर पूर्णविराम कित्येक वर्षांपासून चालू असलेल्या संघर्षाला प्रभाग १४ मध्ये अखेर विजयाचा पूर्णविराम मिळाला.इथे विरोधकांनी बाजी मारत राष्ट्रवादीला धक्का दिला.

किंगमेकर’ बॅनर अन् संशयाचं राजकारण

निवडणुकीनंतर अपक्ष विजेत्यांचे “किंगमेकर” म्हणून बॅनर झळकले.विशेष म्हणजे हे बॅनर लावणारे राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते,माजी पदाधिकारी आणि उपनगराध्यक्षपदापर्यंत पोहोचलेले चेहरे आहेत.मग प्रश्न असा उभा राहतो..अपक्षांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा दिला गेला होता का? तांदळवाडी प्रभाग क्रमांक १ सारखा भाग जिथे शहराध्यक्ष पद आहे इथे सुद्धा उमेदवारांना खूप मेहनतीने व खूप आटातटीच्या सामन्यातून जाऊन निसटता विजय मिळाला आहे याचा पण विश्लेषण याच पण आत्मपरीक्षण झालं पाहिजे.

तसेच प्रभाग क्रमांक आठ मध्ये सुद्धा माझी युवक अध्यक्ष व माजी नगरसेवक एवढे मोठे पद असून सुद्धा तेथील नवख्या उमेदवाराने 754 मताच्या आसपास मत मिळवली याचा अर्थ काय इथे सुद्धा आत्मपरीक्षण झालं पाहिजे?ही आकडेवारीच सांगते की पक्षाची पकड काही प्रभागांमध्ये पूर्णपणे सुटली आहे.आजही बारामतीचा विकास म्हणजे अजित पवार आणि “अजित पवार म्हणजे विकास” हे समीकरण जनमानसात आहे.मात्र या निवडणुकीत काही ठराविक प्रभागांमध्ये हे समीकरण फेल ठरलं.विशेषतःपाटस रोड परिसर हा नेहमीच व्यक्तीकडे पाहून मतदान करणारा प्रभाग. याठिकाणी पक्षाला सुवर्णसंधी होती की संघटन वाढवायची, पण ती संधी हातची गेली.याचाच कळस म्हणजे प्रभाग क्रमांक १०.हा प्रभाग जॉईंट किलर ठरला. येथे पक्षाच्या महिला शहराध्यक्षांना केवळ पराभव नव्हे तर दरारून पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव केवळ मतांचा नव्हता,तर संघटनात्मक अपयशाचा आरसा होता.

खरा प्रश्न इथे उभा राहतो :

जर या प्रभागात सचिन जगदाळे यांना उमेदवारी मिळाली असती,तर निकाल वेगळा लागला असता का? त्यांना तिकीट न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी विरोधात काम केलं का, की मुद्दाम शांत बसून पक्षाला धडा शिकवला? की पक्षानेच योग्य माणसाऐवजी चुकीची निवड केली?असाच प्रकार अनेक प्रभागांमध्ये दिसून आला.कुठे अपक्ष जिंकले, कुठे वेगळ्या चिन्हावर उमेदवार निवडून आले.हे स्पष्ट संकेत आहेत की पक्षाची ताकद असूनही ती योग्य वापरली गेली नाही.ही निवडणूक बारामतीच्या राजकारणात एक महत्त्वाचा इशारा देऊन गेली आहे. फक्त सत्ता, फक्त नाव आणि फक्त पक्ष पुरेसा नाही;आता जमिनीवरचा माणूस महत्त्वाचा आहे.पवारांचं वर्चस्व अजूनही अबाधित आहे,पण या निकालाने हेही दाखवून दिलं आहे की बारामतीत नाराजीचा आवाज आता दबलेला नाही.वेळीच आत्मपरीक्षण केलं नाही,तर ही ठेच भविष्यात मोठ्या हादऱ्याचं रूप घेऊ शकते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *