लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीची महाराष्ट्र बंदची हाक…!!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विकास आघाडीने उद्या ‘महाराष्ट्र बंद’ची हाक पुकारली आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. या हाकेला राज्यातील जनतेची साथ मिळण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी आज जनतेची भेट घेऊन या बंदमध्ये सामील होण्यासाठी विनंती करतील. शेतकऱ्यांविरोधी कृषी कायदे करून शेतमालाची लूट करण्याचे काम केंद्रीय जुलमी सरकारने केले आहे. आता ते शेतकऱ्यांची हत्या करत आहेत.

या विरोधात जनता नक्कीच ‘बंद’ला साथ देईल आणि कडकडीत महाराष्ट्र बंद यशस्वी करून दाखवतील असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला आहे.या हत्येमागे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा हात असल्याचे जनतेने दाखवून दिले असले तरी त्यावर अजून कारवाई होत नाही. यात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या गावात ही घटना घडली आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी ना. नवाब मलिक यांनी केली आहे. शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात संपूर्ण देश शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहील आणि या महाराष्ट्र बंदला पाठिंबा मिळेल,असेही ते म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *