बीड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची राज्यभर चर्चा होत असून,या हत्या प्रकरणाला तब्बल तीन आठवडे झाले असताना देखील या गुन्ह्यातील सातपैकी तीन आरोपी अद्यापही फरार आहेत.यामुळे राज्यभर सरकारचा निषेध व्यक्त केला जातोय.या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.या मोर्चाला राज्यातील हजारो नागरिकांनी उपस्थित दर्शवत आक्रोश व्यक्त केलाय. यामुळे आता सरकार दरबारी बीड हत्या प्रकरणाच्या तपासला वेग आला असून,या हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे..
देशमुख यांच्या हत्येनंतर तिघांना अटक केली होती, त्यानंतर काही दिवसांतच चौथा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला होता,मात्र अस असताना या घटनेतील तीन आरोपी अद्यापही फरार असल्याने राज्यभरातून यावर संताप व्यक्त करत असताना आरोपींना अटक होत नसल्याने पोलीस प्रशासन टीकेची झोड उठवली जात आहे.याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पाऊल उचलण्याचे संकेत दिले असून या प्रकरणातील फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी,अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी बीडमध्ये निषेध मोर्चा घेत केलीये.या मोर्चात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे प्रकाश सोळंके,आमदार संदीप क्षीरसागर,भाजप आमदार सुरेश धस,आमदार अभिमन्यू पवार,माजी खासदार संभाजीराजे असे सर्वपक्षीय नेतेमंडळी सहभागी झाले होते.या मोर्चातून सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी आणि खंडणी प्रकरणात फरार असलेल्या वाल्मिक कराड याला तात्काळ अटक करण्यात यावी,तसेच या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी आशा मागण्या करण्यात आल्यात..
सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर गृहमंत्र्यांचा मोठा निर्णय
दरम्यान,बीडमध्ये तब्बल १२०० लोकांना शस्त्र परवाना देण्यात आल्याने जिल्ह्यात अनेकदा गोळीबाराच्या घटना घडत आहेत.हवेत गोळीबार करून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून दहशत माजवण्याचा प्रयत्नही अनेकांकडून होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने अशावर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करून शस्त्र जमा करावेत,अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याची माहिती मिळत आहे..