मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. यासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान, भाजपाचे नार्वेकर यांनी १६४ सदस्यांचं बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत.दरम्यान,त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आज सत्ताधारी आणि विरोधी गटातील नेत्यांनी भाषणे केली.
राष्ट्रवादीचे अजित पवार,जयंत पाटील कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यासह सुनिल प्रभु आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बंडखोर आमदार आणि भाजपवर निशाणा साधला. दरम्यान,यावरून आता भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.यांसदर्भात त्यांनी एक ट्वीट केल आहे.
ट्वीटमध्ये पडळकर म्हणतात, जयंत पाटलांनी केलेल्या ‘आदिवासी असूनही चांगलं काम केलं’ या विधानाचा अर्थ काय ? जातीयवाद यांच्या मनात रूजला आहे.मी तमाम दलित,आदिवासी, भटक्या विमुक्त बांधवांच्या वतीने या विधानाचा जाहिर निषेध करतो.सत्ता गेली पण माज जात नाही, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी आदिवासी असूनही चांगले काम केले असल्याचा दाखला एका नेत्याला दिला आहे.यावरून त्यांच्यावर टीका होत आहे.