मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडीत संघर्ष पाहायला मिळत आहे.एकमेकांवर सातत्याने राजकीय आरोप – प्रत्यारोप सुरू असून राजकीय वर्तुळातही बऱ्याच घटना घडत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतप्रकरणी गंभीर आरोप केले होते. राऊतांच्या आरोपांनंतर आता किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली असून, माजी सौनिक बबन भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई पोलिसांनी सोमय्यांवर भा.द.वि कलम ४२०, ४०६,३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर बुधवारी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ५७ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. महाराष्ट्रातील राजभवनाच्या नावावर ‘आयएनएस विक्रांत’ जहाज वाचविण्यासाठी गोळा केलेल्या कोट्यवधीच्या निधीचे सोमय्या यांनी काय केले,असा सवाल राऊत यांनी केला होता.”आयएनएस विक्रांत” जहाज वाचविण्यासाठी २०१३-१४ किंवा २०१४-१५मध्ये राजभवनाच्या नावावर गोळा करण्यात आलेले पैसे राज्यपालांकडे जमा करण्यात आले काय,अशी विचारणा माहितीच्या अधिकाराखाली धीरेंद्र उपाध्ये यांनी केली होती.
त्यावर अशी कोणतीही रक्कम जमा करण्यात आली नसल्याचे राज्यपालांच्या कार्यालयाने त्यांना लेखी उत्तरात दिल्याचे राऊत यांनी निदर्शनास आणून दिले. किरीट सोमय्या यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेची आणि राष्ट्रीय भावनेची शुद्ध फसवणूक केली. हा देशद्रोह आहे, असा आरोप राऊत यांनी केला. भाजपचा झेंडा घेऊन देशद्रोही सोमय्यांनी ५७ कोटी रुपये गोळा केले. हा आकडा शंभर कोटींच्या वर असेल. ही रक्कम राजभवनात जमा झालेली नसेल, तर ती कुठे गेली? ती कोणाच्या घशात आणि खिशात गेली? ही रक्कम त्या काळात भाजपने निवडणुकीत वापरली की सोमय्यांच्या निकॉन इन्फ्रामध्ये वापरण्यात आली, असे सवाल राऊत यांनी उपस्थित केले. देशाच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या राष्ट्रद्रोही व्यक्तीला केंद्र सरकारने सुरक्षा देऊन देशाशी प्रतारणा केल्याचा आरोप राऊत यांनी केला.