मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्यात आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची आकडेवारी सातत्याने वाढत आहे.यामध्ये अनेक नेते,आमदार,खासदार, डॉक्टर्स आणि अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.राज्यातील सर्वाधिक पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ५५ वर्षावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करा असे आदेश दिले आहेत.तसेच यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत.
दरम्यान पहिल्या आणि दुसऱ्या लाटे दरम्यानही पोलिसांना अशा प्रकारचे आदेश देण्यात आले होते.तरीही या काळात जवळपास ५०० पेक्षा जास्त पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.त्यात मुंबई पोलीस दलातील जवळपास १२३ कर्मचाऱ्यांचा समावेश होता.त्यामुळे आता लवकरच खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत,असेही सांगण्यात आले आहे.
कोरोना काळात पोलिसांमध्ये विषाणुबधित हाँन्ह्याचे प्रमाण मोठे होते.तसेच पोलिसांवर पडणारा कामाचा ताणही अधिक होता.या ताणामुळे काही पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरोना बाधा झाली नसली तरी इतर शारीरिक व मानसिक व्याधींनी मान वर काढली आहे.या शिवाय नव्या ओमीक्रोन विषाणू प्रकाराचा फैलावण्याचा वेग प्रंचड आहे.विशेषतः सहव्याधीग्रस्त रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये विषाणूं संसर्गाचा धोका अधिक असल्याने गृहमंत्री वळसे पाटील यांची ही घोषणा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
मुंबईत जवळपास ७१ पोलिसांना कोरोना…
मुंबईत गेल्या २४ तासांत ७१ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.तर आतापर्यंत मुंबईत ९५१० पोलीस कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहेत.याशिवाय आजपर्यंत १२३ पोलिसांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे.त्यामुळे मुंबईसह राज्यातील पोलिस दल देखील पुन्हा कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे.याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यात आता पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे.