महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
अनेक वर्ष महाराष्ट्रातील शेतकरी आणि बैलगाडा मालक हे बैलगाडा शर्यतीसाठी प्रयत्न करत होते. याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्यणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांपुढे आपले मत व्यक्त केले.बैलगाडा शर्यत सुरु व्हावी ही इच्छा असणारा आजही ग्रामीण भागात मोठा वर्ग आहे. त्यांच्या दृष्टीने कोर्टाकडून मिळालेला निर्णय आनंददायी आहे. एखादी चांगली गोष्ट झाल्यावर ज्याप्रमाणे आनंद ओसंडून वाहतो अशाप्रकारचा आनंद शेतकरी व बैलगाडा मालकांना झाला आहे. वर्षानुवर्षे घोडे शर्यत सुरु आहे मग बैलगाडा शर्यतीला बंदी का? यामुळे कोर्टाकडून मिळालेला निर्णय अतिशय आनंददायी व समाधानकारक असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
हा लढा सुरु असताना केंद्रात आणि राज्यात अनेक सरकारं आली आणि गेली तरीदेखील न्यायालयात हा विषय असल्याने शेतकऱ्यांना निराशा पत्करावी लागली.मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ठाकरे सरकारमधील मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत हा विषय लावून धरला,याचा आवर्जुन उल्लेख अजित पवारांनी केला.तसेच आमदार अतुल बेनके,आमदार दिलीप मोहीते,आमदार अशोक पवार हे सर्व सहकारी बैलगाडा शर्यतीसाठी आग्रही होते.दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहखाते आल्यावर यावर मार्ग काढण्यासाठी कोर्टात चांगल्यात चांगला वकील देण्यात आल्याचे अजित पवार म्हणाले. या लढ्याला बदनाम करण्याचे काम अनेकदा झाले. निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी काहींनी हा विषय प्रचारात घेण्याचा प्रयत्नही केला,असे अजित पवारांनी सांगितले.