सांगली :-महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
येत्या काही दिवसात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागलेला असेल, असे मोठे विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून चर्चांना उधाण आले आहे. गोपीचंद पडळकरांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी ते बोलत होते.एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे.शिंदेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घरोबा करत सत्ता स्थापन केली आहे. यानंतर शिवसेनेनंतर आता पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न केला जातोय.पवार घराण्यात वर्चस्वाची लढाई झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसही फुटेल, असं विरोधकांना वाटतं.
शिवसेनेनंतर विरोधकांचं पुढचं टार्गेट राष्ट्रवादी असेल, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला होता.अशातच शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे काही आमदार आम्हाला येऊन भेटतात, असे विधान केले होते. यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे.ते म्हणाले की,येत्या काही दिवसात जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागलेला असेल. त्यानंतर बारामती आणि मुंबईमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलेला असेल. काही दिवसांनी राष्ट्रवादी विसर्जित करून ९० टक्के लोक भाजपमध्ये येतील,असेही गोपीचंद पडळकर यांनी म्हंटले आहे.
यामुळे आता जयंत पाटील भाजपात प्रवेश करणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.दरम्यान, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नाराजीच्या चर्चा अनेकदा रंगताना दिसतात.काही दिवसांपुर्वीच दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं होते. या अधिवेशनात जयंत पाटील यांचं भाषण सुरू असताना अजित पवार दोनदा उठून सभागृहाबाहेर गेले. यामुळे नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या. यावरुन सत्ताधाऱ्यांकडूनही जयंत पाटलांना विरोधी पक्षनेते पदावरुन चिमटे काढले होते.तर,विरोधी पक्षनेते पदावरुनही एकनाथ शिंदेंनी जयंत पाटलांना अधिवेशनात डिवचले होते.यामुळे कुछ तो गडबड है, अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत