बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावातील गावठाण मंदिराच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांना गेले वर्षभरापासून आडाचे पाणी बंद आहे. वर्षभरापूर्वी बारामती सोनगांव या बिकेबीएन रस्त्याचे काम झाले आहे या रस्त्यात झारगडवाडी गावाच्या हद्दीतील मारुती मंदिराकडे जाणारी आडाची पाईप लाईन फुटलेली आहे. ही फुटलेली पाईप लाईन अद्याप जोडण्यात आली नाही त्यामुळे मारुती मंदिराकडे राहणाऱ्या नागरिकांना वर्षभरापासून पाण्यावाचून वंचित राहावे लागत आहे. हे पाणी मिळावे यासाठी नागरिक वर्षभरापासून ग्रामपंचायत कडे तोंडी लेखी तक्रारी करीत पाठपुरावा करीत आहेत.
तसेच बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बागल, झारगडवाडी ग्रामपंचायत यांना देखील याबाबत लेखी पत्रव्यवहार केला आहे. मात्र अधिकारी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांना काही पाझर फुटेना यामुळे हक्काचे पाणी मिळवण्यासाठी नेमकं आता काय करायचे असा प्रश्न नागरिकासमोर उभा राहिला आहे. वर्षभरापासून मासिक मिटिंग मध्ये सातत्याने पाण्याची पाईपलाईन जोडणीबाबत आवाज उठवत आहेत.मागील सरपंच यांच्या काळात रस्ता होत असताना पाईपलाईन फुटलेली आहे त्या माझी सरपंचांना देखील याबाबत सातत्याने पाईपलाईन जोडणीची मागणी केली आहे.
महत्वाचे म्हणजे मा.सरपंच याचाच हा वार्ड आहे मात्र तरीदेखील ते याकडे लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सदस्यांच्या मासिक मिटिंग मध्ये ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे मात्र याबाबत काहीच हालचाल झारगडवाडी ग्रामपंचायतीकडून केली जात नाही. या भागातील नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान केल्यामुळेच जाणीवपूर्वक नागरिकांना पाण्यापासून वंचीत ठेवण्याचे काम ग्रामपंचायतचे सत्ताधारी सरपंच उपसरपंच करीत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बोरकर यांनी केला आहे.